नाशिक आणि बीड येथे ऑक्सीजन अभावी रूग्णांचा मृत्यू होण्याचा प्रकार ताजा असतानाच ठाण्यातही आज असा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. वर्तकनगर येथील वेदांत रूग्णालयात ऑक्सीजन अभावी ४ रूग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रूग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र रूग्णालय प्रशासनानं हे मृत्यू ऑक्सीजन अभावी झाले नसल्याचं सांगण्यात आलं. वेदांत रूग्णालयात ४ रूग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यावर रूग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. यामध्ये अरूण शेलार, करूण पष्टे, विजय पाटील, दिनेश पणकार या चार जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रूग्णांच्या मृत्यूला रूग्णालय जबाबदार असल्याचा आरोप केला असून दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी रूग्णालयाला भेट देऊन योग्य ती कारवाई आणि चौकशी करावी आणि मृत रूग्णांचे बील घेऊ नये अशी मागणी डावखरे यांनी केली आहे. तर रूग्ण अत्यवस्थ होते असं रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं. वेदांत रूग्णालयाच्या बाहेर नातेवाईक आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.