स्वातंत्र्य दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार उपस्थित होते.
कोरोना काळात महिला आणि बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले.या उपक्रमांना समाजातील विविध संस्थांनी सढळ हस्ते सहकार्य केले. अशा संस्थांचा यावेळी सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब मिडटाऊनचे राजेंद्र झेंडे, जिंदाल फाउंडेशनच्या विद्या गोरक्षकर,आनंद सर्जाक फाऊंडेशनच्या राजेश मुखर्जी यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. रोटरी क्लब मिडटाऊनने कोविड काळात 200 आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू संच पुरवठा केला होता, जिंदाल फाउंडेशनने 1750 कुटुंबांना प्री मिक्स अन्नधान्य वितरण केले होते, आनंद सर्जाक फौंडेशनने 100 अंगणवाडी स्मार्ट करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले असून 100 शास्त्रोक्त परसबागा तयार करणार आहेत. याचबरोबर रिलायन्स फौंडेशनने 600 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू संच कोविड कालावधीत पुरवला, रोटरी क्लब कल्याण रिव्हरसाईड या संस्थेने 100 आदिवासी कुटुंबांना कोविड कालावधीत अन्नधान्य संच पुरवठा केला होता. लायन्स क्लब जुहू या संस्थेने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 50 अंगणवाडी स्मार्ट करून दिल्या आहेत.रोटरी क्लब इलेगंट यांनी 2 अंगणवाडी स्मार्ट करून दिल्या आहेत. महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून कोविड कालावधीत विविध संस्थाच्या सहकार्याने जेवढे अन्नधान्य संच उपलब्ध करण्यात आले ते अन्नधान्य संच ज्या कुटुंबामध्ये गरोदर महिला, स्तनदा माता आणि कुपोषित बालके असतील अशा कुटुंबांना देण्यात आले. यासाठी महिला व बाल विकास विभागाने असे दाते शोधून गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले.