हिंदू धर्म महान आहे. धर्मानं दिलेली तत्वं आचरणात आणली तर व्यावहारिक आणि परमार्थिक उन्नती होते. हिंदू धर्म कधीही आतंकवाद निर्माण करत नाही. सध्याच्या काळात दुर्जन संघटित असून सज्जनांनीही साधना करून आदर्श राज व्यवस्था निर्माण करण्यासाठी संघटित व्हावं असं आवाहन पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाई यांनी केलं. हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्याचं प्रांतिय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी प्रभुदेसाई बोलत होते. कथित पुरोगामी आणि नास्तिकतावादी मंडळी बहुसंख्य हिंदूंमध्ये भारतीय संस्कृती, हिंदूंच्या प्रथा परंपरा याविषयी घृणा निर्माण करण्याचं काम सामाजिक संकेतस्थळे आणि अन्य माध्यमांद्वारे पध्दतशीरपणे करत आहेत. सद्यस्थितीला पुरोगाम्यांनी आपली स्थिती अशी केली आहे की आज पुरोगामी ही शिवी ठरू लागली आहे असं ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी सांगितलं. या अधिवेशनास विविध संस्थांचे तसंच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, डॉक्टर, उद्योजक, पत्रकार असे अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
