महापौर हा शहराचा प्रथम नागरिक समजला जातो. मात्र ज्या शहराच्या महापौर म्हणून मिनाक्षी शिंदे सध्या विराजमान आहेत त्या शहराच्या महापालिकेत मात्र महापौरांना फारसं महत्व असल्याचं दिसत नाही. ठाणे महापालिका सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपानं गाजत आहे. असाच एक भ्रष्टाचार गेले काही वर्ष सुरू आहे. २०११ मध्ये महापालिकेतर्फे ३० कोटी ९४ लाख रूपये हरित जनपथ आणि उद्यानं तयार करण्यासाठी देण्यात आले होते. यापैकी नक्की किती पैसे खर्च झाले आणि हरित जनपथ आणि उद्यानं कुठे उभारण्यात आली याविषयी माहिती मागणारं एक पत्र माहिती अधिकार कार्यकर्ते संजीव दत्ता यांनी पालिकेला दिलं होतं. यावर काही उत्तर न मिळाल्यामुळं संजीव दत्ता यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली पण त्यावरही काही उत्तर आलं नाही. त्यानंत संजीव दत्ता यांनी महापौरांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. महापौरांनीही याप्रकरणी उद्यान विभागाला पत्र पाठवलं होतं. पण पालिकेनं संजीव दत्ता आणि महापौरांच्या पत्राला उत्तर देण्याचंही सौजन्य दाखवलं नाही. संजीव दत्ता यांनी यावर ९ महिने झाल्यानंतर आपल्या आणि महापौरांच्या पत्राचं काय झालं असं पत्र दिलं पण त्यालाही उत्तर न आल्यामुळं त्यांनी माहिती अधिकारात दुस-यांदा अर्ज केला. पण कशाचाही महापालिकेवर परिणाम झाला नाही. त्यामुळं महापौरांच्या पत्राचीही पालिका प्रशासनाच्या लेखी काहीच किंमत नसल्याचं यावरून दिसून आलं. सध्या थीम पार्क, बॉलिवूड गार्डन यामधील भ्रष्टाचार गाजत असताना हा आणखी एक भ्रष्टाचार गाजण्याची चिन्हं आहेत. झाडं लावण्यासाठी आणि हरित जनपथ बनवण्यासाठी पालिकेनं ३५ कोटी रूपये खर्च केले आहेत.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/10/Mayor-Meenakshi-Shinde.jpg)