मलंगगड पालखी उत्सव सोहळ्यात कोणतंही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच भाविकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. १५ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पालखी उत्सव सोहळा होत असून या सोहळ्याच्या वेळी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या उत्सवानिमित्त संबंधित यंत्रणांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी जिल्हाधिका-यांनी हे आदेश दिले. गर्दीवर नियंत्रण ठेवावं, गडावर स्वच्छ पाणी पुरवठा पुरवावा, गडाच्या पायथ्याशी २ रूग्णवाहिका तयार ठेवाव्यात, गडाच्या एका बाजूला संरक्षक कठडे उभारावेत अशा सूचना जिल्हाधिका-यांनी या बैठकीत केल्या. यात्रेसाठी येणा-या भाविकांकरिता जादा बसेस सोडाव्यात अशी सूचनाही जिल्हाधिका-यांनी या बैठकीत केली.
