मुंबईतील सर्व उपनगरीय गाड्या आता १५ डब्यांच्या होणार आहेत. सर्व उपनगरीय गाड्या १५ डब्यांच्या करण्यासाठी येत्या २ आठवड्यात योजनाबध्द आराखडा सादर करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांना दिले आहेत. रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत गोयल यांनी हे आदेश दिले. सध्या मध्य रेल्वेकडे एकच १५ डब्यांची गाडी आहे. तर मध्य रेल्वेवर पुढच्या वर्षी जूनमध्ये वातानुकुलित गाडी धावणार आहे. मुंबईतील सर्व उपनगरीय गाड्या १५ डब्यांच्या करण्याच्या निर्णयामुळे लोकल गाड्यांची प्रवासी वहन क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे. १२ डब्यांच्या गाडीची क्षमता ही ३ हजार प्रवासी वाहून नेण्याची आहे पण गर्दीच्या वेळी साडेपाच हजार प्रवासी एका गाडीतून प्रवास करतात. तर १६ डब्यांच्या गाडीची क्षमता ही ४२०० प्रवासी नेण्याची आहे पण या गाडीमधून गर्दीच्या वेळी ७ हजार प्रवासी प्रवास करू शकतात. सुरूवातीला १५ डब्यांच्या गाड्या या जलद मार्गावर धावणार आहेत. नंतर त्या धिम्या मार्गावरही सुरू केल्या जातील असं पियुष गोयल यांनी सांगितलं.