ठाणे परिवहन सेवेच्या गलथान कारभाराचा फटका एका निष्पाप व्यक्तीला बसला असून वीजेचा धक्का लागल्यामुळे या निष्पाप व्यक्तीचा बळी गेला आहे. खोपट येथील परिवहन सेवेच्या बस थांब्यावर बस पाहत बसलेल्या भांडूपमधील दोस सलमानी याचा वीजेचा धक्का लागल्यानं काल मृत्यू झाला. उथळसर येथील एका सलूनमध्ये कामाला असलेले सलमानी घरी जाण्यासाठी म्हणून या बस थांब्यावर उभे होते. त्याचवेळी त्यांना हा वीजेचा धक्का बसला. या थांब्यावरील जाहिरात फलकामध्ये असलेला वीज पुरवठा वीज वाहिनीमधून वीज थांब्यामध्ये उतरला आणि त्याचा धक्का बसून सलमानी यांचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. सलमानी यांचं पार्थिव शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आलं असून त्याच्या अहवालानंतर त्यामध्ये नक्की दोष कुणाचा हे स्पष्ट होईल असं पोलीसांतर्फे सांगण्यात आलं.
