ठाणे पोलीसांच्या गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्के वाढ

ठाणे पोलीसांच्या गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्के वाढ झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वार्षिक गुन्हे अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये गुन्हे उघडकीचं प्रमाण ५८ टक्के होते तर २०१८ मध्ये ते ६३ टक्क्यांवर गेलं आहे. २०१८ मध्ये १२ हजार ४३९ गुन्ह्यांची नोंद झाली होती त्यापैकी ७ हजार ८३३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आलं आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली अशा ४ महापालिका आणि अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन नगर परिषदा येतात. ठाणे पोलीस आयुक्तालयात ५ परिमंडळं असून यामध्ये एकूण ३५ पोलीस ठाणी आहेत. २०१८ मध्ये झालेल्या १०८ खूनाच्या गुन्ह्यांपैकी १०२ गुन्हे उघडकीस आले. हत्येच्या प्रयत्नाच्या १४१ गुन्ह्यांपैकी १३६ गुन्ह्यांची उकल झाली. विनयभंग, दरोडा, चोरी, अपहरण, सरकारी कर्मचा-यांना मारहाण, आत्महत्येचा प्रयत्न, निष्काळजीपणे मृत्यूला कारणीभूत ठरणे असे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आलं तर बलात्काराच्या ३०७ गुन्ह्यांपैकी २८८ गुन्हे पोलीसांना उघडकीस आणता आले. तर चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस काहीसे कमी पडले. एकूण १ हजार २२२ गुन्ह्यांपैकी ४९७ चोरीचे गुन्हे उघडकीस आले. अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: