500 चौरस फुट घर असणाऱया ठाणेकराना शिवसेना मालमत्ता कर माफी कधी देणार असा सवाल भारतीय जनता पक्ष नगरसेवक कृष्णा पाटील
यांनी उपस्थित केला आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने मोठा गाजावाज करत 500 चौरस फुटापर्यंत घर असलेल्या ठाणेकरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी कधी होणार असा सवाल नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केला आहे. फेब्रुवारी 2017 साली झालेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी 500 फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करणार असल्याची ग्वाही दिली होती. मात्र सत्तेवर आल्यानंतर या घोषणेचा शिवसेनेला विसर पडला आहे. नगरसेवक कृष्णा पाटील आणि नगरसेविका नंदा पाटील यांनी महापौरांना एक लेखी पत्र देऊन पक्ष प्रमुखांनी दिलेल्या घोषणेचे स्मरण केले होते. तसेच मालमत्ता कर माफीच्या प्रस्तावाची सूचना नगरसेवक कृष्णा पाटील यांनी महापौरांना देऊन डिसेंबर 2017 च्या महासभेत चर्चा करुन ठाणेकरांना करमाफी देण्याची विनंती केली होती. मात्र आजपावतो ठाणेकरांच्या 500 फुटापर्यंतच्या घरांना करमाफी मिळालेली नाही. मुंबई प्रमाणे ठाणेकरांना तात्काळ करमाफीची घोषणा करावी अशी मागणी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केली आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/10/tmc1.jpg)