जिल्ह्यातील १४६ नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये १४६ नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यास जिल्हाधिका-यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळं नागरिकांना चांगल्या सेवा मिळू शकणार आहेत. उर्वरित रिक्त जागांसाठी किंवा अपात्र ठरलेल्या व्यक्तींनी देखील ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. आपले सरकार सेवा केंद्राच्या नावांची यादी ठाणे डॉटएनआयसी डॉट ईन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ठाण्यात ८३, अंबरनाथमध्ये ९, कल्याण २८, भिवंडी १४, शहापूर १०, मुरबाड ३, उल्हासनगर ८ अशी सेवा केंद्रं असणार आहेत. शासनानं ठरवून दिलेले दरच या केंद्रांना आकारता येतील. ठरवून दिलेले वेळापत्रक आणि निर्देशांचं काटेकोर पालन, डीजीटल पेमेंटला प्राधान्य आणि मंजूर केलेल्या ठिकाणीच केंद्र चालवणं केंद्र चालकाला बंधनकारक राहणार आहे.
