आगरी-कोळी भूमीपुत्र महासंघातर्फे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

समूह विकास योजनेमध्ये आगरी-कोळी समाजावर होणा-या अन्यायाविरोधात उद्या आगरी-कोळी भूमीपुत्र महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. सरकारने कोळीवाडे आणि गावठाणे वगळण्याचा लेखी अध्यादेश न काढल्यास ठाण्यात क्लस्टरला विरोध करण्याचा निर्धार आगरी-कोळी महासंघाने केला आहे. क्लस्टरमधून कोळीवाडे आणि गावठाण वगळण्यासंबंधीची घोषणा पालकमंत्र्यासह मुख्यमंत्र्यानी अधिवेशनात केली मात्र अद्याप याबाबतचा अध्यादेश  काढलेला नाही. किंबहुना सिमांकन करण्यात महसूल विभागाची दिरंगाई सुरु आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाकडन क्लस्टरवर सुनावण्या घेतल्या जात असल्याचा आरोप आगरी-कोळी भुमीपुत्र महासंघाने केला आहे. ठाण्यातील कोळीवाडे आणि गावठाणचे विस्तारित सीमांकन करावे. औद्योगिक प्रयोजनाकरीता घेतलेल्या शेतजमीनीचा मोबदला शेतकऱ्यांना अत्यल्प तर काहींना मोबदलाच दिला नाही. आता या जमिनींचे प्रयोजन बदलून जमिनीवर टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. तर क्लस्टर योजनेतून कोळीवाडे आणि गावठाण परिसर वगळण्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांनी करूनही या योजनेविरोधात नागरिकांनी दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्याची प्रक्रिया पालिकेने सुरुच ठेवली असल्याने संभ्रम निर्माण झाला असल्याचा आरोप महासंघाचे सदस्य गिरीश साळगावकर, पुंडलिक वाडेकर, माजी नगरसेवक हिरा पाटील आदींनी केला आहे. कोस्टल रोड, मेट्रो कास्टींग यार्ड प्रकल्पास नागरिकांचा विरोध असून त्यासाठी शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत याकडे सरकार आणि महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी उद्या सकाळी सुमारे 5 हजार भूमिपुत्र जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading