सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते झालं. यावर्षी मानवाचे चंद्रभूमीवरील पावलास ५० वर्ष पूर्ण होत आहेत. याचं औचित्य साधून मानवाचे चंद्रभूमीवरील पाऊल पन्नाशीत या संकल्पनेवर आधारीत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये खगोलशास्त्र आणि भारताने अंतराळ क्षेत्रामध्ये केलेली प्रगती या विषयावरील माहितीबरोबरच इतर विषयांवरीलही पुस्तकं प्रदर्शित करण्यात आली आहेत. ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, पु. ल. देशपांडे, अमृता प्रितम या साहित्यिकांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांचे साहित्य आणि या संदर्भातील वृत्तपत्रातील कात्रणं प्रदर्शित करून त्यांना अभिवादन करण्यात आलं आहे. यावर्षी प्रथमच या ग्रंथ प्रदर्शनामध्ये ग्रंथालयात नवीन आलेले ग्रंथ त्यांच्या प्रकाशित ग्रंथ परिक्षणांसहीत प्रदर्शित करण्यात आले आहेत. जेणेकरून विद्यार्थी ही परिक्षणं वाचून पुस्तकं वाचण्याकरिता उद्युक्त होतील. हे प्रदर्शन उद्यापर्यंत सर्वांसाठी खुलं आहे.