राज्यातील पहिल्या वातानुकुलित टपाल कार्यालयाची दुरावस्था झाली असून वातानुकुलित यंत्रणा ठप्प झाल्यानं कर्मचा-यांना श्वास घेणंही मुश्कील होऊ लागलं आहे. राज्यातील पहिले वातानुकुलित टपाल कार्यालय ३ वर्षापूर्वी कोपरीतील सदगुरू गार्डन गृहसंकुलातील मेरीगोल्ड इमारतीच्या तळघरात सुरू झालं. हे टपाल कार्यालय वातानुकुलित असल्यानं सुरूवातीला सर्वांनाच त्याचं कौतुक होतं. मात्र गेल्या तीन महिन्यापासून या कार्यालयातील जुनाट पध्दतीची चारही वातानुकुलित यंत्र बंद पडली असल्यानं आणि कार्यालयात हवा खेळती ठेवण्यासाठी कोणतीही इतर यंत्रणा नसल्यानं कर्मचा-यांना कोंदट वातावरणात काम करावं लागत आहे. या टपाल कार्यालयात ४ महिलांसह २४ कर्मचारी आहेत. तर २५ हजारांच्या आसपास खातेधारक असून त्यातील २ हजार ज्येष्ठ नागरिक आहेत. रोज अडीचशे ते तीनशे ग्राहकांची या टपाल कार्यालयात ये-जा असते. परंतु वातानुकुलित यंत्रणा बंद असल्यानं कार्यालयातील कोंदट वातावरणात एखादा कटू प्रसंग उद्भवल्यास जबाबदार कोण असा सूर ग्राहकांमध्ये उमटत आहे. हे टपाल कार्यालय गैरसोयीचं असून काही महिन्यापूर्वीच या टपाल कार्यालयातून दीड लाखांची रक्कम भामट्याने लंपास केली होती. कार्यालय तळघरात असल्यानं ज्येष्ठ नागरिकांनाही ते गैरसोयीचं ठरलं आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2019/02/WhatsApp-Image-2019-02-22-at-9.14.00-AM.jpeg)