भावनिक बुध्दीमत्ता आणि साक्षरता वाढवण्यासाठी इक्विप किडस् या संस्थेनं सुरू केलेलं काम अत्यंत गरजेचं असून ते मोलाचं आहे असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केलं. डॉ. संदीप केळकर यांच्या इक्विप किडस् या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भावनांच्या महोत्सवाचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. २१वं शतक हे मानसिक रोगांचं शतक असल्याचा तज्ञांचा निर्वाळा आहे. ताणतणाव, नैराश्य आणि चिंता समाजात वाढली आहे. आत्महत्येच्या प्रमाणातही सव्वाशे टक्क्यांनी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर समाजामध्ये भावनिक साक्षरतेचा प्रचार आणि प्रसार करणारी इक्विप किडस् ही भारतातली पहिलीच संस्था असल्याचं डॉ. संदीप केळकर यांनी सांगितलं. एक दिवसाच्या या महोत्सवात ३०० पालक आणि मुलं उपस्थित होते. विविध प्रकारच्या ४० सत्रांचा अनुभव त्यांनी यावेळी घेतला. निरनिराळ्या प्रकारचे खेळ आणि प्रयोगांमधून त्यांना यावेळी भावनिक बुध्दीमत्तेचं दर्शन घडलं.