कोंकण विभागात १०५ शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे. त्यात एका वेळेस २२ हजार ७५४ थाळ्यांची विक्री केली जाते. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील कोणीही माणूस उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन केंद्रासह सामुहीक भोजन व्यवस्था निर्माण केली आहे. ठाणे २ केंद्र ४०० थाळया, पालघर १२ केंद्र २ हजार १०० थाळ्या, रायगड २४ केंद्र २ हजार थाळ्या, रत्नागिरी १४ केंद्र १ हजार ३५० थाळ्या, सिंधुदूर्ग ११ केंद्र ७५० थाळ्या अशी कोंकण विभागात एकूण ६३ शिवभोजन केंद्र व ६ हजार ६०० थाळ्यांना मंजूरी मिळाली असून मुंबई-ठाणे रेशनिंग एरियाला ४२ केंद्र १६ हजार १०० थाळ्या मंजूर झाल्या आहेत. या शासनाच्या निर्णयानुसार शिवभोजन केंद्रातून गरजूंना जेवण दिले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरीकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करु नये यासाठी ठाणे ग्रामीण ३ हजार ५६३ तर मुंबई-ठाणे शहरी भागासाठी ३९ हजार ४४४ किराणा दुकानांना वस्तू विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे.