कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला जीव धोक्यात घालून काम करणा-या शासकीय सेवेतील कर्मचा-यांना मानवंदना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या वाजवण्याच्या केलेल्या आवाहनाला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र काही ठिकाणी त्याचा अतिरेकही झाला. काल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यु लागू करण्यात आला होता. या जनता कर्फ्युलाही जवळपास १०० टक्के प्रतिसाद मिळाला. अगदी तुरळक व्यवहार सोडता शहरामध्ये सर्वत्र शांतता होती. संध्याकाळी ५ वाजता आपला जीव धोक्यात टाकून काम करणा-या शासकीय कर्मचा-यांना मानवंदना देण्यासाठी टाळ्या वाजवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. पण काही ठिकाणी मात्र याचा अतिरेक झाला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या काही अंतर ठेवून राहणं आवश्यक आहे मात्र टाळ्या वाजवण्यासाठी लोकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. काही लोकांनी तर टाळ्यांबरोबरच थाळ्या, घंटा, मृदुंग, तबले आणि अगदी ढोलवादनही केलं. काही ठिकाणी घोषणाबाजी झाली. यामुळं हे आवाहन करण्यामागच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला.