ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिकेपाठोपाठ आता जिल्हा परिषदेनंही अभ्यागतांना ३१ मार्च पर्यंत प्रवेश बंदी केली आहे. जिल्हा परिषद मुख्यालय आणि पंचायत समिती स्तरावरील सर्व कार्यालयांना भेट देणा-या अभ्यागतांना ३१ मार्चपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्यालय तसंच पंचायत समिती स्तरावर दैनंदिन आणि वैयक्तीक कामासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक तसंच सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, समाजसेवक, ठेकेदार यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून ही प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तथापि नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर निवेदन, टपाल आणि झेडपी ठाणे डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या ई-मेलवर पत्रव्यवहार करता येईल. या काळात नागरिकांची कामं प्रलंबित राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्या आहेत.