वाघबीळ ते गायमुख पर्यंत मेट्रोचं काम थांबवण्याची प्रताप सरनाईकांची मागणी

मेट्रो प्रशासनाबरोबर जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत वाघबीळ ते गायमुख पर्यंत मेट्रोचं काम थांबवावं अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मेट्रोच्या कामासंदर्भात बराच गोंधळ असून यासंदर्भात नगरविकास मंत्र्यांनी बैठकीचं आयोजन करावं तोपर्यंत हे काम थांबवावं अशी लक्षवेधीच सरनाईक यांनी मांडली आहे. घोडबंदर रस्त्यावर मेट्रोच्या कामाला सुरूवात झाली त्यावेळी कासारवडवली, भाईंदरपाडा आणि गायमुख येथे उड्डाणपूल बांधून त्यावर मेट्रो पिलर उभारावे अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. पण त्याचा विचार न करता मेट्रोची निविदा काढली. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत लक्षवेधी मांडली असता मेट्रो प्रशासनानं आपली चूक कबूल करून त्याठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचं लेखी आश्वासन दिलं. पण एकदा मेट्रो पिलरची उभारणी झाल्यानंतर त्या ठिकाणी उड्डाणपूल कसे उभारणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नगरविकास मंत्र्यांकडे सरनाईक यांनी तक्रार केली असून तिन्ही उड्डाणपूलासह मेट्रोचं काम सुरू करावं असं सरनाईक यांचं म्हणणं आहे. हे काम झालं नाही तर घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास त्याला मेट्रो प्रशासनाला जबाबदार धरावं असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. मेट्रो कास्टींग यार्डाच्या जागेबाबत प्रशासन उत्तर देणं टाळत आहे. त्याचप्रमाणे कासारवडवली येथील मेट्रोचं आरक्षण टाकलेल्या जमिनी आदिवासी जमिनी असल्याचं ५ वर्षानंतर मेट्रोला लक्षात आल्याबद्दलही सरनाईक यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एकूणच या प्रश्नांबाबत नगरविकास मंत्र्यांनी बैठकीचं आयोजन करावं तोपर्यंत वाघबीळ ते गायमुख मेट्रोचं काम थांबवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading