राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. महिलांवरील वाढते अत्याचार आणि जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण न करता केलेल्या फसवणुकीविरोधात ही निदर्शनं करण्यात आली. या निदर्शनात माजी खासदार किरिट सोमय्या, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आदी मान्यवर सहभागी झाले होते. राज्यातील शेतक-यांची शासनानं फसवणूक केली. अवकाळी पाऊस आणि कर्जमाफीमध्ये शेतक-यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली तर गेल्या महिनाभरात महिलांवरील अत्याचारात वाढ होऊनही शासन ढिम्म आहे त्याचा कार्यकर्त्यांनी निषेध केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समूह विकास योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गावठाण असलेल्या हजुरीचा समूह विकास योजनेत सामावेश करण्यात आला. महापालिका निवडणुकीदरम्यान ५०० चौरस फूटापर्यंत मालमत्ता करात करमाफी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. कळवा, ऐरोली रेल्वे मार्गाच्या कामातील विस्थापितांना कळव्यातच घरं द्यावी, दिवा परिसरातील बेकायदेशीर डंपिंग ग्राऊंड बंद करावे अशा विविध मागण्यांचं एक निवेदन जिल्हाधिका-यांना यावेळी देण्यात आलं.