ठाणे महापालिका करत असलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिराच्या पाठीमागे आणि हरीत पट्टा म्हणून घोषित असलेल्या भूखंडावर तळ अधिक पहिल्या मजल्यापर्यंतचे बांधकाम सुरू आहे. याबाबत जागरूक नागरिक आणि धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी चौकशी केली असता या भूखंडावर ठाणे महापालिकाच बांधकाम करत असल्याचं त्यांना समजलं. लँड रेकॉर्डच्या नकाशाप्रमाणे ही जागा मासुंदा तलाव म्हणून दर्शवत आहे तर महापालिकेच्या मंजूर आराखड्यानुसार हा भूखंड हरित पट्टा म्हणून राखून ठेवला आहे. हा भूखंड कौपिनेश्वर मंदिराजवळ असून त्यास हेरिटेज कायद्याचे सर्व नियम लागू होतात. मात्र असं असताना महापालिका भर घनतेच्या क्षेत्रातील हरित पट्ट्यात बेकायदेशीर बांधकाम कसे करू शकते असा प्रश्न नितीन देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. हे बेकायदेशीर बांधकाम तात्काळ पाडावे आणि हरित पट्टा तसंच हेरिटेज कायद्याचे संरक्षण करावे अशी मागणी देशपांडे यांनी जिल्हाधिका-यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. गेल्या महिन्यात खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबईतील पश्चिम उपनगरात तलाव बुजवून केलेला बगिचा पूर्ववत करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते याची आठवणही नितीन देशपांडे यांनी जिल्हाधिका-यांना करून दिली आहे.