महाविकास आघाडी सरकारनं शेतक-यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळं राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. एका पत्रकार परिषदेत शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी ही माहिती दिली. महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या काळात शेतक-यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना प्रति हेक्टर २५ हजार रूपये आणि फळबागांसाठी प्रति हेक्टर ५० हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. सरसकट कर्ज माफी करू, साताबारा कोरा करू अशा घोषणा करणा-या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकही आश्वासन पाळलं नाही. गेल्या महिनाभरात राज्यातील महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचार करणा-या गुन्हेगारांना धाक बसवण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री सत्कार घेण्यात मशगुल आहेत. महिला अत्याचारात झालेली वाढ आणि शेतक-यांची फसवणूक या निषेधार्थ हे धोरण आंदोलन केलं जाणार असल्याचं निरंजन डावखरे यांनी सांगितलं.