मुंबई-चैन्नई मेलला ठाण्याला थांबा मिळावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांच्याकडे करण्यात आली आहे. रेल्वे समस्येविषयी आवाज उठवणारे विनायक थत्ते यांनी यासंदर्भात खासदार राजन विचारे यांच्याकडे एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारी मुंबई-चैन्नई मेल ही गाडी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी मुंबईहून सुटते. या गाडीला पुण्याच्या पुढे म्हणजे जेऊर, भिगवण अशा काही लहान स्थानकांवरही थांबा आहे. पण ठाण्यासारख्या महत्वाच्या स्थानकावर गाडी थांबत नाही. रात्री-अपरात्री लोकांना या गाडीकरिता कल्याण गाठावं लागतं. परंतु याच कालावधीत उत्तरप्रदेशकडे जाणारी महानगरी एक्सप्रेस ठाण्याला थांबू शकते. दुर्दैवानं ठाण्यातील लोकांना पुण्याकडे जाणा-या गाड्यांकरिता नेहमीच रेल्वे प्रशासनाशी झगडावे लागते. तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांनी इंद्रायण, डेक्कन, सिंहगड या गाड्यांना ठाण्याला थांबा मिळवून दिला होता. असा थांबा आता मुंबई-चैन्नई मेलला मिळावा अशी मागणी थत्ते यांनी खासदार राजन विचारे यांच्याकडे केली आहे.