डोंबिवलीतील प्रदूषण करणा-या कंपन्या या रहिवासी विभागातून इतरत्र हलवल्या जातील असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी काल कल्याणला भेट दिली आणि विविध विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. डोंबिवलीतील प्रदूषण करणा-या कंपन्या जिल्ह्यामध्ये कुठे हलवता येतील याविषयी १५ दिवसात अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सांगितलं. डोंबिवलीतील नागरिकांनी तेथील कंपन्या, वाया गेलेली रसायनं रस्त्यावर टाकत असून त्यामुळं प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी या प्रदूषणाची पाहणी करावी त्याचप्रमाणे धोकादायक प्रदूषण करणा-या कंपन्यांनी सुरक्षेचे उपाय योजावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. जुन्या आणि भंगारमध्ये उभ्या करून ठेवलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी धोरण तयार करण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.