ठाणे ते पनवेल वातानुकुलित उपनगरीय सेवेचा उद्यापासून शुभारंभ होत आहे. मध्य रेल्वेनं ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर वातानुकुलित सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून उद्यापासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. खासदार राजन विचारे यांनी ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकातून भारतातील पहिली रेल्वे सेवा सुरू झाली तिथूनच पहिली वाताकुलित रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी केली होती. आता रेल्वेनं उद्यापासून ही सेवा सुरू केली जात असल्याचं त्यांना कळवलं आहे. काही वर्षापासून भावेश नकाते यांचे गर्दीमुळे अपघाती निधन झाल्यानंतर एक समिती नेमण्यात आली होती. या समितीचे सदस्य म्हणून काम करताना राजन विचारे यांनी २०१६ मध्ये ठाणे ते पनवेल अशी वातानुकुलित रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतरच याबाबतचं नियोजन सुरू झालं. ठाणे रेल्वे स्थानकात फलाटांची संख्या कमी असल्यामुळं काही तांत्रिक अडचणींमुळे या रेल्वे सेवेचं उद्घाटन पनवेल येथून करण्यात येणार आहे. ठाण्यात येणारी ही लोकल संध्याकाळी ४ वाजता पुन्हा पनवेलसाठी सुटणार असून त्यावेळी या रेल्वेला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.