जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणा-यांच्या विरोधात महसुल विभागानं हाती घेतलेल्या धडक कारवाईत ६ कोटी ४८ लाख रूपयांचं साहित्य आणि रेती साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. ही माहिती अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. जिल्ह्यातील मुंब्रा, पारसिक, कळवा रेतीबंदर, काल्हेर रेतीबंदर, वडूनवघर, खारबाव, वेहेळे, उल्हास नदी खाडीपात्र, टेभा, तानसा या परिसरातील खाडी किनारी सक्शन पंपाच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा होतो अशा तक्रारी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये ३२ सक्शन पंप आणि २५ बार्ज कटरच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आले तर ३३० ब्रास रेती तर ५० ठिकाणी रेती उपशासाठी उभारण्यात आलेले हौद उध्वस्त करण्यात आले. ठाणे, कल्याण, भिवंडी आणि शहापूरच्या तहसिलदारांसमवेत ६ अधिका-यांसह महसुल विभागातील कर्मचारी, पोलीस असे १५० जणांचे पथक या कारवाईत सहभागी झाले होते.