अब्दुल कलाम, बिस्मिल्ला खान, ब्रिगेडीयर उस्मान यांचा सर्व धर्म समभाव काँग्रेसला नकोय, त्यांना याकूब मेनन, अफजल गुरू, बुरहाण वाणीचा सर्व धर्म समभाव हवा आहे. धार्मिक कट्टर पथियांच्या विचाराला बळ देऊन पहिले देश तोडणारी आणि देशात तोडफोड करणारी काँग्रेसची शेरोशायरी देखील आता पाकिस्तानी झाली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुंधाशु त्रिवेदी यांनी ठाण्यात बोलताना केली. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत प्रथम पुष्प गुंफताना त्रिवेदी यांनी ही टीका केली. धर्माच्या नावावर जो देश जन्माला आला त्याचे धर्म बांधवांनीच दोन तुकडे केले. मात्र भारत असा देश आहे ज्यात सर्व धर्मीय एकत्र नांदले, वाढले. मतांसाठी असे देश तोडत राहिले आणि आता संपूर्ण देशात तोडफोड करत आहेत. नागरिकता कायदा या मूळ काँग्रेसने आणलेल्या कायद्याला मोदी सरकार प्रत्यक्षात उतरवत असताना काँग्रेसला राजकारण करून देशाला फक्त अडचणीत आणायचं आहे अशी टीका सुंधाशु त्रिवेदी यांनी यावेळी केली. देशात कोण शरणार्थी आणि कोण घुसखोर आहेत हे मोदी सरकारला चांगलंच ठाऊक आहेत त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत राष्ट्र निती म्हणून सीएएची अंमलबजावणी होणार असा विश्वास त्रिवेदी यांनी व्यक्त केला. ज्यांना कालपर्यंत परराज्यातील भारतीय देखील नको होते ते सत्तेच्या मोहापायी परराष्ट्रातील घुसखोरांची तळी उचलत असल्याची टीका सुंधाशु त्रिवेदी यांनी शिवसेनेवर केली.