ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे प्रकल्पाचं काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी लोकसभेत शून्य प्रहर काळात उपस्थित केली आहे. कळवा ते ऐरोली दरम्यान २ किलोमीटर लांबीच्या नव्या उन्नत रेल्वे मार्गाचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालेल्याला ३ वर्ष झाली आहेत. पण या उन्नत मार्गाचं काम अत्यंत धिम्या गतीनं सुरू आहे. या मार्गातील २१०० झोपड्यांचं पुनर्वसन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून न झाल्यानं हे काम रखडलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना या मार्गिकेच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्राधिकरणाला आदेश द्यावेत अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी शून्य प्रहर काळात केली. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर कर्जत-कसा-याकडून नवी मुंबईकडे येणारा प्रवाशांचा लोंढा ठाण्यात न येता तो थेट नवी मुंबईत जाऊ शकतो यासाठी हे काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे.