पनवेल-वसई रेल्वे मार्गावर मेमु रेल्वेची संख्या वाढवावी आणि या मार्गावर उपनगरीय रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. लोकसभेमध्ये शून्य प्रहर काळात शिंदे यांनी ही मागणी केली. पनवेल-वसई मार्ग हा यापूर्वीच उपनगरीय रेल्वे मार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. परंतु डोंबिवली आणि दिवा स्थानकादरम्यान असणा-या अप्पर कोपर रेल्वे स्थानकावरून रोज २५ हजार प्रवासी प्रवास करत असताना केवळ ४ गाड्या सोडल्या जातात. यामुळे सकाळी येथील नागरिकांना कामकाजाच्या ठिकाणी दोन तास आधी पोहचावे लागते. सध्या प्रवाशांना या गाड्या तोकड्या पडत असल्यामुळं गर्दीमध्ये रेल्वे पकडताना नागरिकांच्या जीवाला हानी पोहचू शकते. तोकड्या रेल्वे गाड्यांच्या संख्येमुळं होणारा त्रास आणि दैनंदिन प्रवासी संख्या वाढत असल्यामुळं या रेल्वे स्थानकावर पडणारा ताण लक्षात घेता पनवेल-वसई मार्गावर धावणा-या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी तसंच पनवेल-वसई मार्गावर मेमु ऐवजी उपनगरीय सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी आग्रही मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहर काळात केली.