जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकावर ठाण्यातील विविध संघटनांच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. देशभराच्या कानाकोप-यात चाललेल्या बलात्कार आणि स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनांचा निषेध यावेळी करण्यात आला. तेलंगणातील तरूण डॉक्टर महिलेवरील सामुहिक बलात्कार आणि हत्या, उत्तरप्रदेश येथील उन्नाव मधील बलात्कारीत पिडीतेची जामिनावर सुटलेल्या आरोपींनी केलेली हत्या, नागपूर येथील पाच वर्षाच्या बालिकेवर बलात्कार आणि हत्या, भिवंडीतील स्वत:च्या कन्येवर बापाने केलेली बलात्काराची घटना अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर ही निदर्शनं करण्यात आली. गुन्हा नोंदवताना टाळाटाळ, हयगय करता कामा नये, प्रत्येक गुन्ह्याचा तपास करून कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि विनाविलंब न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं. समाजातील पिडीत स्त्रीला आपलेपणानं वागवावे किंवा एकटे टाकू नये, संकट प्रसंगी तिला वाचवण्याचा प्रयत्न करावा, न्यायालयात तिला योग्य साथ द्यावी असं आवाहनही करण्यात आलं.