ठाणे महापालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रखडलेल्या राज्याभिषेक शिल्प दुरूस्तीकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे गटनेते नारायण पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक शिल्पाच्या दुरूस्तीसाठी २०१५ मध्ये सर्वसाधारण सभेनं मान्यता दिली होती. मात्र निविदेतील वादग्रस्त अटींबरोबरच विविध कारणांमुळे निविदा काढण्यात आली नव्हती. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी दोनवेळा शिल्प दुरूस्तीचं काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात २ लाखापेक्षा अधिक कामाची निविदा मागवण्याबाबत अधिनियमात तरतूद नसल्यामुळे प्रत्यक्षात काम सुरू झालंच नाही. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी नारायण पवार यांनी पालिका आयुक्तांचं याकडे लक्ष वेधलं होतं. पण त्यावर काही कार्यवाही झाली नाही. आचारसंहिता संपल्यानंतरही कार्यवाही केली जात नसल्यामुळं नारायण पवार यांनी थेट उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून या प्रश्नाकडे लक्ष वेधलं आहे. पवार यांच्या पत्रानंतर मात्र तातडीनं हालचाली सुरू झाल्या असून त्यातूनच महापौरांनी शिल्प बसवण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं जातं.