घराघरातून रद्दीत जाणारी पुस्तकं एकत्रित करून त्यातील दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन करण्याचा उपक्रम कॉस्मिक इकॉलॉजिकल ट्रस्ट आणि मैत्री फौंडेशननं हाती घेतला आहे. अनेक घरांमध्ये पुस्तकं पडून असतात. लहान मुलांपासून ते अगदी आजोबांच्या काळातील पुस्तकं पहायला मिळतात. ठराविक काळानं पुस्तकांचा वापर कमी होतो. सुरूवातीला कौतुकानं आणलेल्या पुस्तकांची नंतर अडगळ होऊ लागते. अशी पुस्तकं अनेकदा रद्दीत जातात. या रद्दीत जाणा-या पुस्तकांमध्ये दुर्मिळ ग्रंथही असू शकतात ज्यांचं संवर्धन झाल्यास तो अनमोल ठेवा होऊ शकतो. त्यामुळं अशा पुस्तकांचं डिजिटलायझेशन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आदिवासी पाडे, गावखेड्यातील वाचनालय तसंच अनाथाश्रमासारख्या सेवाभावी संस्थांना निधीअभावी पुस्तकं घेता येत नाहीत. आपल्याकडे वापराअभावी असलेली पुस्तकं अशा संस्थांना मोलाची ठरू शकतात. त्यामुळं नागरिकांनी या चळवळीला हातभार लावावा असं आवाहन प्रवीण गावडे यांनी केलं आहे. यासाठी पुस्तकं घरून नेण्याचीही त्यांची तयारी आहे. या अक्षर चळवळीसाठी ८४२४०५०८०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.