ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ६२ लाखाहून अधिक किंमतीचा अंमली पदार्थ पकडला असून ५ जणांना जेरबंद केलं आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यापूर्वी १९ नोव्हेंबरला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं सलमान शेख आणि संजीव उर्फ रामअध्याय चौहान या दोघांना नवी मुंबईतून अटक केली होती. त्यांच्याकडून ५ एलएसडी पेपर आणि २ ग्रॅम मेफेड्रीन पावडर हस्तगत करण्यात आली होती. या दोघांच्या सखोल चौकशीत नितीन लांबतुरे, सुशांत रसाळ या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १०४ एलएसडी पेपर हा अंमली पदार्थ, ५६ ग्रॅम मेफेड्रीन असा सुमारे ७ लाखांचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांच्या सखोल चौकशीत प्रेम अय्यर या आणखी एका आरोपीस अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण ४७ लाखांचा ९५४ ग्रॅम एलएसडी पेपर हस्तगत करण्यात आला आहे. या पाचही आरोपींच्या ताब्यातून १ हजार ६३ एलएसडी पेपर, ५८ ग्रॅम मेफेड्रीन असा एकूण ६२ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.