महापौर नरेश म्हस्के यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेनं रात्रीच्या अंधारात करण्यात आलेल्या झाडांच्या कत्तलीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तीन हात नाका येथे मेट्रोच्या ठेकेदाराकडून रात्रीच्या अंधारात वृक्षतोड करण्यात आली होती. त्याविरोधात ठाणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या वृक्षतोडीविरोधात ठाणे मतदाता जागरण अभियानानं महापौरांची भेट घेऊन रात्रीच्या अंधारात झाडांची कत्तल करण्याच्या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता आणि याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार महापौरांनी याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेचे वरिष्ठ उद्यान निरिक्षक केदार पाटील यांनी मेट्रोच्या ठेकेदार आणि अधिका-यांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात या कत्तलीविरोधात तक्रार दाखल केली आहे.