मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय स्तरावरील माहिती कार्यशाळेचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं होतं. या कार्यशाळेचं उद्घाटन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना उद्योग विभागाच्या नियंत्रणाखाली उद्योग संचलनालयामार्फत अंमलबजावणी केली जात असून जिल्हास्तरावर शहरी भागाकरिता जिल्हा उद्योग केंद्र आणि ग्रामीण भागाकरिता खादी आणि ग्रामोद्योग कार्यालय यांच्यामार्फत योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात आहे. शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक, युवतींची आणि उद्योग, व्यवसाय क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणं हा यामागचा उद्देश आहे. या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाईन पध्दतीनं होणार आहे. यासाठी सीएमईजीपी हे पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलं आहे. अर्जदारांनी अर्ज केल्यानंतर जिल्हास्तरावरील स्थापित कार्यबल समितीच्या छाननीअंती मान्यता दिलेले प्रस्ताव संबंधित बॅंकांना शिफारस केले जातील. बँकांमार्फंत प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून कर्ज मंजुरीबाबत निर्णय घेतला जाईल. मंजूर प्रकल्प किंमतीस पात्र असणारे अनुदान संबंधित कर्ज खात्यात वितरित केलं जाईल. अधिक माहितीसाठी मैत्री डॉट महाऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.