अल्प कालावधीत दुप्पट रक्कम देण्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या त्रिपुरा चिटफंड या गुंतवणूक कंपनीविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. कल्याण पूर्वेत राहणा-या गितांजली अत्तरदे यांनी ही तक्रार नोंदवली आहे. संपूर्ण भारतात शेकडो शाखा असलेल्या त्रिपुरा चिटफंडस् प्रायव्हेट लिमिटेड या गुंतवणूक कंपनीचं कार्यालय नौपाड्यातील नालंदा चेंबर्समध्ये आहे. २०१५ ते २०१७ या कालावधीत गितांजली अत्तरदे यांच्यासह ८ जणांनी या कंपनीत काही रक्कम गुंतवली होती. गुंतवलेल्या रक्कमेची मागणी केल्यावर २ लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. मात्र नंतर हा धनादेश वटलाच नाही. तेव्हा त्यांनी पुन्हा कंपनीच्या कार्यालयाकडे धाव घेतली त्यावेळी या कार्यालयाला टाळे ठोकले असल्याचं आढळलं. यामुळं फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं कंपनीच्या केरळ, चेन्नई आणि मुंबईतील अधिका-यांच्या विरोधात १४ लाखाहून अधिक रक्कमेची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.