जनसहभागातून जलसंधारण आणि जलसंधारणातून मनसंधारण याद्वारे दुष्काळाविरोधात काम होत आहे. श्रमशक्ती आणि जनशक्तीच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याकामी पाणी फौंडेशनने पुढाकार घेतला आहे. यात ज्ञानप्रबोधिनी सहकार्य करत आहे. दुष्काळग्रस्त गावक-यांचे मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी आणि थेट दुष्काळी भागात जाऊन श्रमदान करण्यासाठी शहरी भागातील नागरिक पुढे यावेत यासाठी विवेकवाडी परिवार पुढाकार घेत आहे. या सगळ्यांच्या समन्वयातून शहरवासिय दुष्काळी भागात जाऊन यथाशक्ती योगदान देत आहेत. या भगीरथ प्रयत्नांविषयी जनजागरण करण्याच्या हेतूनं ठाण्यात १ डिसेंबर रोजी सहयोग मंदिर येते पाण्याची गोष्ट हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विवेकवाड़ी परिवार आयोजित या कार्यक्रमाला पाणी फौंडेशनचे सत्यजित भटकळ, ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद चिक्षे आणि दुष्काळग्रस्त भागातील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील गावकरी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे. ठाणेकरांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन विवेकवाडी परिवारानं केलं आहे.