पत्रीपूल मार्च महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार

कल्याण-डोंबिवली परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला पत्रीपूल मार्च महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पूलाच्या वेब गर्डरचं काम हैद्राबाद येथे सुरू असून ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम झालं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी हैद्राबाद येथे जाऊन याची पाहणी केली आणि त्यानंतर मार्च महिन्यापासून वाहतूक सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला. पत्रीपूलाला समांतर असा आणखी एक पूल उभारला जाणार असून त्याचंही काम सुरू झालं आहे. सध्याच्या पत्रीपूलाचं पायलिंग आणि खांब उभारण्याचं काम प्रत्यक्ष सुरू असून हैद्राबाद येथील ग्लोबल स्टील कंपनीमध्ये गर्डरचं काम सुरू आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे आणि पूलाचं काम करणा-या कंत्राटदारांच्या अधिका-यांसमवेत या कामाची पाहणी केली. पूलाच्या प्रत्यक्षजागी कल्याणच्या दिशेला ८ पैकी ६ खांब, डोंबिवली दिशेला ६ पैकी ४ खांबांचं काम पूर्ण झालं आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत ही कामं आणि पूलापर्यंतच्या रस्त्याचं काम पूर्ण होईल. त्यानंतर ओपन वेब गर्डर टाकून मार्च महिन्यापर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल तसंच तिस-या पूलाचं कामही सुरू झालं असून हा पूल जूनपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading