ठाण्यामध्ये टोल मुक्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मानवी साखळी करून शांततापूर्ण आंदोलन करण्यात आलं. टोलनाक्यावर MH04 या अनुक्रमांकाच्या वाहनांकडून तरी टोल घेऊ नये म्हणून हे आंदोलन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी आमदार संजय केळकर यांनी MH04 या अनुक्रमांकाच्या वाहनांकडून टोल न घेण्याचा निर्णय झाल्याचं जाहीर केलं होतं. मात्र टोलनाक्यावर टोल घेणं सुरूच असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आमदार संजय केळकर हे खोटं बोलत असल्याचा आरोप केला. आज सकाळी आनंदनगर टोलनाका ते कोपरी ब्रीजपर्यंत मानवी साखळी करण्यात आली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टोलनाका येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या हातात टोलचा झोल बंद करा, आश्वासनांचे फुटले ढोल-सामान्य नागरिक भरतोय टोल अशा आशयाचे फलक होते. ठाणेकरांना अगदी मुलुंडमध्ये जाण्यासाठीही टोल भरावा लागत असल्यामुळं ठाणेकरांवर हा अन्याय असल्याच्या भावना अनेक वाहन चालकांनी व्यक्त केल्या.