गेले साडेतीन महिने प्रलंबित असलेली सर्वसाधारण सभा तातडीनं घेण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते नारायण पवार यांनी महापौरांकडे केली आहे. १९ जुलैला झालेली सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली होती. २० ऑगस्टची सर्वसाधारण सभा अतिवृष्टीच्या कारणामुळे रद्द करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सप्टेंबर महिन्यात विशेष सर्वसाधारण सभा घेण्याबाबत पत्र देण्यात आलं होतं. मात्र त्यावर काहीच निर्णय झाला नाही. गेल्या साडेतीन महिन्यात आचारसंहितेचा काळ वगळता सर्वसाधारण सभा का बोलवण्यात आली नाही याबाबत एक कोडंच निर्माण झाल्याचं नारायण पवार यांनी म्हटलं आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील ७ महिन्यांचा कालावधी संपुष्टात आला आहे. अनेक प्रकल्प रखडले असून अनेक विषय प्रलंबित आहेत. या विषयांवर तातडीनं निर्णय घेण्याची नितांत आवश्यकता आहे. यामुळे तातडीनं सर्वसाधारण सभा बोलवण्याची मागणी नारायण पवार यांनी महापौरांकडे केली आहे.