ठाण्यातील वाहतूक पोलीसांना दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं. वाहतूक सुरळीत सुरू रहावी म्हणून वाहतूक पोलीस नाक्यानाक्यावर वाहतूक नियंत्रण करण्यात व्यस्त असतात. त्यांच्या शब्दकोषात अभ्यंगस्नान, फटाके, फराळ, दिवाळी पहाट असं काही नसतं. त्यामुळं त्यांच्या कर्मभूमीवरच त्यांना दिवाळी फराळ दिला तर त्यांची दिवाळी सुखकर होईल या कल्पनेतून सत्यजित शहा आणि डॉ. मृदुला भावे यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. चिवडा, चकल्या, लाडू, करंजी, शंकरपाळी असा विविध प्रकारचा फराळ पिशवीतून देण्यात आला. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयापासून या फराळ वाटपाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर ठाणे वाहतूक शाखेच्या विविध चौक्यांवर जाऊन तेथील वाहतूक पोलीसांना फराळाचं वाटप करण्यात आलं. कासारवडवली, कापुरबावडी, राबोडी, विटावा, ऐरोली अशा विविध वाहतूक शाखेच्या चौक्यांवरती या फराळाचं वाटप करण्यात आलं.