टोरंट हटाव मोहिमेअंतर्गत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. कळवा-मुंब्रा विभागातील महावितरणचं खाजगीकरण करण्यात आलं आहे आणि येथील ठेका टोरंट कंपनीला देण्यात आला आहे. ठाण्यामध्ये भिवंडीतही टोरंट कंपनीला ठेका देण्यात आला असून याबाबत ब-याच तक्रारी आहेत. भिवंडीतील अनुभव पाहता कळवा-मुंब्राकरांनी टोरंट कंपनीला विजेचं वितरण आणि वसुलीचं काम देण्यास विरोध दर्शवला आहे. यावर अनेक आंदोलनं झाली. माजी उर्जामंत्री, पालकमंत्री, प्रशासकीय अधिका-यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गा-हाणं गाऊनही काहीच उपयोग झालेला नाही. ३१ जुलैच्या बैठकीत माजी उर्जामंत्र्यांनी या ठेक्याला स्थगिती दिल्याचं तोंडी सांगितलं होतं आणि या ठेक्याविषयी नवीन सरकार निर्णय घेईल असं सांगण्यात आलं होतं पण त्यानंतरही कळवा-मुंब्रा परिसरात टोरंट कंपनीचे कामगार आणि अधिकारी फिरत आहेत. त्यांनी पडले गावात काही कामही सुरू केल्यानं त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळं या कंपनीला विरोध दर्शवण्यासाठी आणि हा ठेका रद्द करावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.