ठाणे पूर्वतील गणसिध्दी मित्रमंडळानं अनोख्या पध्दतीनं गणपती विसर्जन केलं. ठाणे पूर्व चेंदणी कोळीवातील लक्ष्मी चाळीतील काही तरूण-तरूणी ५ दिवस गणपतीची सेवा करतात. ही सेवा कलेच्या स्वरूपातली असते. गेली ५ वर्ष पर्यावरणपूरक मखर अथवा देखावा तयार करून तिथे गणपती प्राणप्रतिष्ठापना केली जाते. तसंच चाळीतील लोकांसाठी दोन व्याख्यानं, लहान मुलांसाठी निबंध किंवा चित्रपट स्पर्धा असे उपक्रम राबवले जातात. गणरायाचं विसर्जनही अनोखं असंत. हे विसर्जन पर्यावरण पूरकच असतं. सर्व गणपती ज्या ठिकाणी विसर्जनासाठी येतात त्या सार्वजनिक विसर्जन घाटावर हे विसर्जन होतं. पण तेही अनोख्या पध्दतीने. विसर्जन करण्यासाठी एक मोठा टप किंवा पातेलं वापरलं जातं. त्यात पाणी साठवून गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. विसर्जन झाल्यावर पुढे काय ? त्यासाठी ही मंडळी विसर्जन केलेलं पात्र कोणत्या तरी मित्राच्या घरी दोन-तीन दिवस ठेवतात. गणेश मूर्ती पूर्ण जलमय झाली की त्यातून शाडूची माती वेगळी काढून घेतली जाते. मग ह्याच मातीतून पुढच्या वर्षीच्या गणपतीची मूर्ती साकारण्यासाठी पुन्हा मूर्तीकाराला दिली जाते. अशाप्रकारे अनोखं विसर्जन करण्याची गणसिध्दी मंडळाची पध्दत आहे.