विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यामध्ये आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली. मात्र मतदान हे अतिशय संथगतीनं सुरू
असल्याचं दिसून आलं. सकाळच्या सुमारास पावसाचं वातावरण होतं. ढग दाटून आले होते. मात्र पावसानं तुरळक हजेरी लावली. ११ नंतर मात्र
सूर्याचं दर्शन झालं आणि कडक उन्हाच्या झळाही जाणवू लागल्या. पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी ७ ते ९ या वेळेत अवघं ५ टक्के मतदान झालं.
मात्र नंतरच्या दोन तासात मतदानाचा वेग किंचित वाढला आणि पहिल्या चार तासात म्हणजे ११ वाजेपर्यंत साडेबारा टक्के मतदानाची नोंद झाली.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सकाळी सहकुटुंब मतदान केलं. आमदार संजय केळकर यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. आमदार
प्रताप सरनाईक यांनीही सहकुटुंब मतदान केलं. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही
मतदानाचा आपला हक्क बजावला. ठाण्यातील सेलिब्रिटीही मतदान करण्यात मागे नव्हते. संजय जाधव, विजू माने, रवि जाधव अशा अनेकांनी
मतदानाचा आपला हक्क बजावला. ग्रामीण भागातही मतदानात उत्साह होता. पावसामुळे अनेक ठिकाणी चिखल झाला होता. हा चिखल तुडवतच
लोकांना मतदान करायला जावं लागत होतं. काही ठिकाणी मतदान यंत्रांना शॉक लागत असल्याच्याही तक्रारी होत्या.