शिवसेनेनं सरकारला पाठिंबा दिला नसता तर सरकार अस्थिर होऊन राज्याचं नुकसान झालं असतं. हे नुकसान टाळण्यासाठी शिवसेनेनं सरकारला पाठिंबा दिला आणि त्यामुळेच हे सरकार ५ वर्ष टिकू शकलं असा दावा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना केला. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वागळे इस्टेट येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. आम्ही कधीही सरकारच्या पाठीत वार केला नसून गद्दारी आणि विश्वासघात शिवसेनेच्या रक्तात नाही असंही उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. ठाण्यामध्ये शिवसेनेनं तळमळीनं काम केलं असून ठाणेकरांसोबत आपले वेगळे संबंध आहेत. इथले सर्व लोक सर्व काळामध्ये खांद्याला खांदे लावून उभे राहतात असे उद्गार उध्दव ठाकरे यांनी यावेळी काढले. निवडणुकीत आमच्यासमोर लढायला राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिल्लक नाही. कारण त्यांच्यासमोर कुणीच आदर्श नसून त्यांना फक्त सत्तेची लालसा आहे. विरोधकांकडे कोणतेही विकासाचे मुद्दे, दिशा नाही. आपण मात्र एखादा मुद्दा न पटल्यास रस्त्यावर उतरून तो ठामपणे मांडला. यापुढेही गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा उध्दव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला.