ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेत गेले काही दिवस सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीनंतर महापालिका आयुक्त आणि पालकमंत्र्यांमधील वाद संपुष्टात आला. शहरातील भूखंडांच्या वाटपाचे प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. शहरातील काही भूखंड मुंबईतील शैक्षणिक संस्थांना १ रूपया भाड्याने देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीनं विरोध दर्शवला होता. शिक्षण मंडळाचे काही प्रस्तावही नगरसेवकांच्या विरोधानंतर नामंजूर करण्यात आले होते. त्यामुळे आयुक्त अस्वस्थ झाले होते. त्यांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्याचं फर्मान सोडलं होतं. त्यानंतर आक्रमक झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांवर तोंडसुख घेतलं होतं. पालिका आयुक्तांनीही आपल्या विरूध्द अविश्वासाचा ठराव आणावाच असं आव्हान दिलं होतं. महापौरांनीही महापालिका आयुक्त केवळ बांधकाम व्यावसायिकांच्या हिताचे प्रस्ताव मंजुरीसाठी आणतात असा आरोप करून राळ उडवून दिली होती. मात्र या वादात उध्दव ठाकरे यांनी मध्यस्थी केली आणि हा वाद संपुष्टात आला.