गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात ठाणे पोलीस आयुक्तालयात दीड दिवसांच्या एकूण ३९ हजार ८४० गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. यामध्ये ४ सार्वजनिक तर ३९ हजार ८३६ घरगुती गणपतींचा समावेश होता. ठाणे महापालिकेनं पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत विविध ठिकाणी विसर्जनाची सोय केली होती. यासाठी कृत्रिम तळी निर्माण करण्यात आली होती. त्याचप्रमाणे विसर्जनासाठी श्री गणेश मूर्ती स्वीकार केंद्रही निर्माण करण्यात आली होती. गणेश भक्तांनी भर पावसात वाजतगाजत, नाचत गणरायाला निरोप दिला. गणेश भक्तांच्या भक्तीच्या रसाबरोबरच पावसामुळे गणेशभक्त भिजून चिंब झाले होते. अनेक ठिकाणी भर पावसातच मिरवणुका पहायला मिळत होत्या. मासुंदा तलाव इथे तर गणेश विसर्जनासाठी रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं.