ठाणे शहरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तयार करण्यात आलेला तिसरा पूल आता थेट पटणी मैदानानजिक उतरवण्यात येणार असून तेथूनच विकास आराखड्यातील पटणी ते कोपरी या पूलाला तो जोडण्यात येणार आहे. त्यामुळं नवी मुंबईकडून येणारी वाहतूक थेट हायवेला जोडली जाणार आहे. यामुळं शहरातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. यासंदर्भातील आराखडा सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तयार केला असून त्याला मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे. जेएनपीटी कडून येणारी वाहतूक टोल वाचवण्यासाठी कळवा मार्गे येत असते. त्यामुळं या भागात निर्माण झालेली वाहतूक कोंडी शहरावर परिणाम करते. त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा खाडीवर तिसरा पूल मंजूर करून घेतला. सध्या या पूलाचं काम वेगवान पध्दतीनं सुरू आहे. आता या पूलाची व्याप्ती वाढवण्यात येणार असून तो थेट पटणी कंपनीमध्ये उतरवण्यात येणार आहे. तिथूनच विकास आराखड्यात मंजूर असलेल्या पटणी ते कोपरी पूलाला हा पूल जोडण्याचा प्रस्ताव आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडला आहे. मुंबई महानगर प्राधिकरणानं या भागाचा सर्व्हे देखील केला असून त्याचा अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणानं या पूलाच्या उभारणीसाठी निधी देण्याचं मान्य केलं आहे. या पूलाचा आराखडाही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तयार केला असून लवकरच या आराखड्याच्या मंजुरीसाठी ते खासदार सुप्रिया सुळेंसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.