जालना येथे मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराविरोधात शहर काँग्रेसच्या वतीने ठाण्यात मेणबत्ती मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. मुंबईमध्ये सामूहिक अत्याचाराला बळी पडलेल्या मूळच्या जालना येथील तरूणीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या नराधमांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सरकारचा निषेध करत काल मेणबत्ती मोर्चा काढला होता. ठाणे काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेणबत्ती मोर्चात सहभागी झाले होते. प्रदेश सदस्य मिलिंद खराडे यांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोदी आणि फडणवीस सरकारच्या राज्यात महिला आणि मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. परंतु आरोपींवर सरकार कठोर कारवाई करत नाही. त्यामुळे सत्तेचे राजकारण करणाऱ्या सरकारला धडा शिकवला पाहिजे यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे मनोज शिंदे यांनी सांगितले तर ८ दिवसात सरकारने याप्रकरणी आरोपीना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल असे मोर्चाचे आयोजक प्रदेश सदस्य मिलिंद खराडे यांनी सांगितले.