एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी असणारी वागळे इस्टेट एमआयडीसी घपलेशाही, घराणेशाही आणि गुंडशाही मुळे बंद पडल्याचा घणाघात आरोप राजमाता जिजाऊंचे वंशज आणि इतिहासकार प्रा. नामदेवराव जाधव यांनी केला आहे.
संजय घाडीगांवकर आयोजित ठाणे फर्स्ट फौंडेशनच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कोपरी पाचपाखडी भागातील तरुणांना व्यवसाय आणि उद्योगाबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी संजय घाडीगांवकर यांनी ठाणे फर्स्ट फौंडेशनच्या वतीने उद्योजक छत्रपती शिवाजी महाराज या प्राध्यापक नामदेवराव जाधव यांच्या गाजलेल्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.वागळे इस्टेट हा भाग एकेकाळी आशियातील सर्वात मोठा औद्योगिक भाग, मात्र मागील काही वर्षांत येथील अनेक कंपन्या बंद पडल्याने येथील तरुण रोजगारासाठी नवी मुंबई, मुंबई जात असतो. औद्योगिक धोरणाबाबत अनास्था असल्याने याचा फटका येथील तरुणांना बसत आहे. क्लस्टर योजनेबाबत बोलताना नामदेवराव जाधव म्हणाले की, नागरिकांनी केवळ घराच्या बदल्यात घर न मागता व्यावसायिक गाळे मागावेत आणि त्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, यासाठी लोकांचे नेते म्हणून संजय घाडीगांवकर यांनी येथील नागरिकांना मार्गदर्शन करावे असे ते म्हणाले. कोपरी-पाचपाखाडी भागातील ज्या तरुणांना उद्योजक व्हायचं असेल त्यांना आपण जे मार्गदर्शन लागेल ते करू असे सांगताना लवकरच या भागात तरुणांसाठी संजय घाडीगांवकर यांच्या प्रयत्नाने संपूर्ण दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात येईल असेही नामदेवराव जाधव यांनी यावेळी सांगितले. शहरातील स्त्यांबाबत बोलताना नामदेवराव जाधव म्हणाले की, ठाण्यातील रस्ते खड्यात आहेत की रस्त्यात खड्डे आहेत हे कळायला मार्ग नाही, पनवेल, नवी मुंबईतील रस्ते चांगले आहेत. मात्र ठाण्यात खड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी संजय घाडीगांवकर यांच्या ठाणे फर्स्ट फौंडेशनच्या माध्यमातून ठाणेवासीयांच्या वतीने तरुणांना रोजगारचे मार्गदर्शन करणाऱ्या प्रा.नामदेवराव जाधव यांचा महाराष्ट्र युथ आयकॉन म्हणून सन्मान करण्यात आला.यावेळी ठाण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांचा नामदेवराव जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.