शहरातील दिव्यांगांना हक्काचं घर मिळणार आहे. १० सप्टेंबर पर्यंत पहिल्या टप्प्यातील घरांचे वितरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाहाकरिता स्टॉल उपलब्ध करून देण्याबरोबरच हक्काच्या निवा-याची सोयही महापालिकेकडून केली जाणार आहे. बीएसयुपी अंतर्गत पहिल्या टप्प्यात देण्यात येणा-या घरांचा ताबा १० सप्टेंबर पर्यंत दिला जाणार आहे. त्याचबरोबर अतिरिक्त १०० नवीन घरं देण्याचा निर्णयही महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. घरं देताना ८० टक्के अपंग असणा-या दिव्यांगांना प्राधान्य देण्यात येणार असून ४० टक्के अपंग असणा-या दिव्यांगांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आलं होतं. या सर्व मागण्यांबाबत चर्चा करून आयुक्तांनी सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. एकूण १९० दिव्यांगांना घरं दिली जाणार असून त्या घरांसोबत अतिरिक्त १०० घरंही दिली जाणार आहेत. भारतात कोठेही घर नसल्याची अट रद्द करून ठाणे जिल्हा, मुंबई आणि नवी मुंबई येथे घर नसलेल्या दिव्यांगांना घरं दिली जाणार आहेत.